
कुडाळ ता. 10 – कुडाळ पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार सौरभ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंदे यांना राजकीय शह देत तब्बल 2077 एवढ्या मताधिक्क्याने एैतिहासिक विजय संपादन केला. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील निवडणुकीतील विजयामुळे सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला नवी झळाळी मिळाली आहे. पंचायत समितीच्या राजकीय गोळाबेरजेत भाजपा यशस्वी झाल्यास जावळीच्या सभापतपदाची संधी सैारभबाबा शिंदे यांच्या निमित्ताने कुडाळकरांना मिळू शकते. तसेच कुडाळ जिल्हा परिषद गटातील भाजपचे तीनही उमेदवार विययी झाले असून कुडाळ गट यानिमित्ताने काबिज करण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवार सैा.जयश्री सुहास गिरी व सायगाव गणातून सैा.चारूशिला विवेक पवार यांनीही दैदिप्यमान विजय मिळवला. माजी आमदार स्व.लालसिंगराव शिंदे यांच्या चारित्र्यसंपन्न निस्पृह राजकीय घराण्याचा वारसा, राजकारणातील प्रगल्भता आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्यासह इतर सहकारी संस्थांचे असणारे पाठबळ यांचा विचार करता सौरभ शिंदे यांना केवळ गट आणि गणाच्या राजकारणावर केंद्रित न राहता त्यांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे संधी निर्माण झाली आहे. या निवडणुकीत सैारभ शिंदे यांना 5209 एवढी मते मिळाली तर राषट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंदे यांना 3132 एवढी मते मिळाली, तसेच शिवसेनेचे उमेदवार प्रशांत तरडे यांना 609 मते मिळाली.

कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या पाठीमागे भाजपा विचारसरणी व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भक्कम पाठबळ लाभले. त्याचबरोबर त्यांना घराण्याचा राजकीय वारसा, सहकारी संस्थांचे पाठबळ होते. गेल्या दहा वर्षात सौरभ शिंदे यांनी ज्येष्ठ व युवकांचे संघटने केले. गेले तीन वर्ष प्रतापगड कारखाना सुरू असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये असणाऱ्या समाधानाचा फायदा सौरभ शिंदे यांना झाला. कुडाळ गावासह गणातील काही गावांमध्ये पक्षांतर्गत असणारे गट व असणारी नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले. अखेरच्या टप्प्यात योग्य डावपेच आखत सौरभ शिंदे यांनी सर्वांना बरोबर घेऊन निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन केले.

नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ गटात भाजपची भक्कम ताकद आहे. निवडणूक पूर्व विरोधकांची वैचारिक पातळी पाहता भाजपा विरोधी पक्षांनी ही निवडणूक सोडून दिल्यातच जमा होती. निवडणूक लागल्यानंतर ऐनवेळी उमेदवारांची शोधा शोध आणि ऐनवेळेच्या शिकस्तीवर उमेदवार उभे करण्याचे वेळ विरोधकांना आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर कुडाळ गट भाजपाने निर्विवाद काबीज केला आहे.






