
कुडाळ ता.21 : जावली सारख्या दुर्गम भागातील बंद असलेला साखर कारखाना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचे वतीने सुरू करण्यात आला असल्याने स्थानिक शेतकरी, सभासदांना नक्की फायदा होईल, तसेच सध्या अडचणीत सापडलेल्या साखर
कारखानदारीला केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक मदत होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे यांना दिले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन प्रतापगड साखर कारखाना अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे यांनी मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,माजी आमदार स्वर्गीय लालसिंगकाका शिंदे यांनी मोठ्या हिमतीने ग्रामीण भागात कारखाना सुरू करण्याचे धाडस करून सहकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला,त्यांच्या पश्चात अनेक अडचणी आल्या,मात्र त्यावर मात करून कारखाना सुरू करण्यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे व सौरभ शिंदे यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने जे प्रयत्न केले त्यामुळेच तेथील सहकार जिवंत राहिला आहे, नामदार शिवेंद्रसिंहराजे हे मंत्री मंडळात आमचे जवळचे सहकारी असून अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योगच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा देखील झाली.या चर्चेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी संचालक दादा पाटील, अजिंक्यतारा चे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही कारखाना च्या वतीने सौरभ बाबा शिंदे यांनी सत्कारही केला.
