मुंबईस्थित सातारा- जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध – आ. शिवेंद्रराजे; मताधिक्याने विजयी करण्याचा मुंबईकर मतदारांचा निर्धार

कुडाळ ता.११- सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावून प्रत्येक गाव, वाडी, वस्तीतील लोकांना सुविधा पुरवण्याचे काम केले आहे. पर्यटन वाढ आणि रोजगार व व्यवसाय वृद्धीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. माझ्या मतदारसंघातील असंख्य लोक नवी मुंबई येथे नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहेत. या सर्व मुंबईकरांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून यासाठी भविष्यातही कटिबद्ध राहीन, असा शब्द आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

नवी मुंबई येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मुंबईतील बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, उपाध्यक्ष संदीप शेलार, के. के. शेलार, उद्योजक श्रीरंग केरेकर, दत्ताशेठ गावडे, कविता धनावडे, विजय सावले, विनोद शिंगटे आदी मान्यवरांसह नवी मुंबई, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ, भांडूप आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजेंनी मतदारसंघात असंख्य विकासकामे मार्गी लावून आमच्या गावाचा, भागाचा सर्वांगीण विकास केला आहे. आमच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच सहकार्य करतात. बाबाराजेंना विक्रमी मतांनी विजयी करून पुन्हा आमदार करू, असा निर्धार उपस्थित हजारो मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केला. विविध योजना आणि विकासकामे मार्गी लावून आपल्या मतदारसंघाचा कायापालट केला आहे. सातारा व जावली तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात पर्यटन वाढ व्हावी आणि त्यातून स्थानिकांना रोजगार व व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी प्राधान्य दिले आहे, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले. आगामी काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाती. आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम ठेवून मला विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेंनी मुंबईकरांना केले
.
