जावळी

जावलीतील शेतकऱ्यांचा एैन गणेशोत्सवात जलसमाधीचा इशारा – महू हातेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समीतीच्या वतीने साखळी उपोषणासह आंदोलनाची घोषणा

कुडाळ ता. 24 – जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाचे काम गेल्या 30 वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू
आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचे व कालव्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु तरीही उर्वरित दहा टक्के कामाबाबत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रशासनाने अंतिम तारीख जाहीर करावी यासाठी बुधवार दिनांक 03 सप्टेबर पासून तीव्र आंदोलन छेडत साखळी उपोषण व वेळप्रसंगी महू धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.


कुडाळ ता.जावळी येथे महू हातेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समीतीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले, जावली तालुक्यात ऐन गणेशोत्सवात हे आंदोलनहोत असल्याने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या कोणत्याही परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही मानकुमरे यांनी दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष व प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, समितीचे सचिव व जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जावली तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप परमणे, माजी उपसभापती तानाजी शिर्के, कुडाल सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

महू व हातगेघर धरणाच्या लाभक्षेत्रातील 41 गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ता. 27 ऑगस्ट पासुन सुरु होणारे आंदोलनात प्रत्येक गावातुन कोपरा सभा, महिला व पुरुष, लहान मुले यांचेकडुन जनजागरण, महिला मंडळाच्या वतीने भररस्त्यावर झिम्मा फुगड्यांचे माध्यमातून रास्ता रोको करुन प्रशासनाला इशारा देणारे आंदोलन सुरु करण्यात येईल. बुधवार ता 03 सप्टेबर पासून करहर येथील विठ्ठल रुक्मिनी मंदिर परिसरात धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांचे साखळी उपोषण सुरु होईल. दुपारी 1.00 वाजता दरे बु. य़ेथे पंचक्रोशीतील सर्व गावे यांचा महिला, पुरुष व मुले यांचा सामुहीक रास्ता रोको व आक्रोश आंदोलन करतील. दुपारी 4.00 वाजता कुडाळ येथील बाजारपेठेत भव्य दिव्य आंदोलन व शासनाच्या, प्रशासनाच्या विरोधात जाहिर निषेध सभा होईल. गुरुवार ता. 04 सप्टेंबर रोजी सायगाव येथे सकाळी 11.00 वाजता जनजागृती व रास्ता रोको व ठिय्या आंदोलन होईल. दुपारी 4.00 वाजता करहर येथे महिला व पुरुषांचा जन आक्रोष आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ता. 6 सप्टेंबर रोजी गावोगावचे गणपती विसर्जनावेळी महु हातगेघर धरणामध्ये तसेच या धरण क्षेत्रात येणाऱ्या 41 गावातील लाभधारक शेतकरी तलाव, नद्या या मध्ये उड्या मारुन जलसमाधी घेतील. कुडाळ विभागाला संजीवनी ठरणारे महु – हातगेघर धरण 100 टक्के पुर्ण झाले आहे. तसचे धरणाच्या दोन्ही बाजुंनी पाणी वितरकांचे काम जवळजवळ पुर्णत्वास येऊन 41 लाभ क्षेत्रातील 41 गावांतील शिवारात पाणी पोहोचणार असुन संपुर्ण कुडाळ विभाग सुजलाम सुफलाम होणार आहे. परंतु गेली अनेक वर्षे किरकोळ समस्यांमुळे या विभागातील शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी असुनही आजतागायत शेतात कॅनॉलचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या विभागातील शेतकऱ्यांची झालेली आहे. तसेच महु- हातगेघर धरणाच्या प्रकल्पबाधीत धरणग्रस्तांची अगदी किरकोळ कामे शासन दरबारी प्रलंबीत आहते. या धरणग्रस्तांना पाणी अडविल्यामुळे शेतीचा, घरामध्ये राहण्याचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने त्यांच्या या प्रश्नाकडे गेली 25 वर्षे लक्ष न दिल्यामुळे या धरणग्रस्तांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. धरणग्रस्तांचे प्रश्नांची शासन दरबारी त्वरीत सोडवणुक न झालेमुळे धरणग्रस्तांवर व लाभक्षेत्रातील जनतेवर अन्याय होत आहे. तरी या पार्श्वभुमीवर महु – हातगेघर धरणाचे लाभक्षेत्रातील 41 गावांचे शेतकरी व प्रकल्प बाधीत धरणग्रस्त शेतकरी यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन उभारण्यात आले असल्याची माहीतीही सांगण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button